पावसाळ्यात मोठ्या संख्येने मुंबई आणि पुण्याहून येणारे पर्यटक सुरूर-वाईमार्गे (Wai Vishesh) पांचगणी आणि महाबळेश्वरला जातात. परंतु आता त्यांना वाईला जाण्यासाठी पर्याची मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. वाई-सुरूर मार्गावर रस्त्याचे आणि पुलाचे काम सुरू असल्यामुळे सुरुरहून वाईकडे जाणारी वाहतूक 15 ऑगस्टपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी तसे परिपत्रक जारी केलं आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, सुरूर ते वाई या मार्गावरील रस्त्याचे आणि पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतुककोंडी होऊ शकते. यामुळे 18 जून ते 15 ऑगस्टपर्यंत सुरूर-वाई रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या नागरिकांनी पाचवडमार्गे वाईला जायचं आहे. तसेच महाबळेश्वरहून पुणे व मुंबईला जाणाऱ्या वाहनांसाठी वाई-सुरूर हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी सुरू असणार आहे. वाहतुककोंडी टाळण्यासाठी करण्यात आलेल्या या बदलांच पालन करण्याच आवाहन पोलीस अधिषक तुषार दोशी यांनी केलं आहे.