Know Your Rights – पोलिसांनी पकडल्यानंतर काय करावे आणि काय करू नये! जाणून घ्या आपला अधिकार

पोलीस म्हटल की आजही सामान्य माणसाच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे जर पोलिसांनी काही कारणास्तव पकडलं तर, लोकांची भंबेरी उडते. चांगले पोलीस असतील तर थोडक्यात चौकशी करून सोडून देतात. परंतु जर पैसे खाणारे लाचखोर पोलीस असतील तर, ते या परिस्थितीचा चुकीचा फायदा घेण्याच्या तयारीत असतात. अशा वेळी ज्यांना आपले अधिकार (Know Your Rights) माहित असतात ते ही परिस्थिती निभावून नेतात. परंतु ज्यांना आपल्या अधिकारांबद्दल माहिती नसते त्यांची मात्र चांगलीच कोंडी होते. तुम्हालाही असा काही अनुभव आला आहे का? आला असेल तरी आता घाबरू नका. या लेखामध्ये आपण याचीच माहिती घेणार आहोत. जर पोलिसांनी तुम्हाला पकडलं (अटक केली) तर तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याची माहिती जाणून घेणार आहोत.

पोलिसांनी पकडल्यानंतर काय करावे?

1. शांत रहा आणि सहकार्य करा

आरडाओरडा न करता पोलिसांशी सभ्य आणि शांतपणे वागा. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शांतपणे द्या. 

2. तुमच्या अधिकारांची माहिती घ्या

  • तुम्ही अटक का केली आहात? – हे विचारण्याचा तुम्हाला पूर्ण हक्क आहे.
  • एफआयआर (FIR) ची प्रत मागा – जर तुमच्यावर FIR दाखल झाली असेल तर त्याची प्रत मागा.
  • वकिलाची मदत घेण्याचा हक्क – अटक होताच वकिलाशी संपर्क साधण्याचा तुम्हाला घटनात्मक हक्क आहे.
  • मौन धारण करण्याचा अधिकार – तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास बांधील नाही.

3. कोणालातरी सूचित करा

अटक केल्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा वकिलाला ताबडतोब कळवा. पोलिसांना हे करण्यास सांगणे तुमचा अधिकार आहे.

4. मेडिकल तपासणी मागा

अटक केल्यानंतर तुम्हाला मेडिकल तपासणी करून घेण्याचा अधिकार आहे, यामुळे नंतरच्या काळात मारहाणीचा किंवा छळाचा आरोप करता येतो.

पोलिसांनी पकडल्यानंतर काय करू नये?

1. दहशतीखाली जबाब देऊ नका

कधीही दबावाखाली, धमकीला घाबरून किंवा मारहाणीमुळे खोटी कबुली देऊ नका.

2. कागदांवर सही करू नका (वाचल्याशिवाय)

कोणत्याही जबाबावर किंवा कागदावर सही करू नका, तो नीट वाचल्याशिवाय आणि तुमच्या वकिलाशी चर्चा केल्याशिवाय.

3. लाच देऊ नका

पोलिसांना लाच देणे किंवा देण्याचा प्रयत्न करणे ही कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे टाळा.

4. पळण्याचा किंवा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करू नका

यामुळे गुन्हा गंभीर होतो आणि अतिरिक्त आरोप (जसे की पोलिसांवर हल्ला) लावले जाऊ शकतात.

5. खोटी माहिती देऊ नका

तुमचं नाव, पत्ता, ओळख याबाबत पोलिसांना खोटी माहिती देणे ही कायद्याने शिक्षा होण्याजोगी बाब आहे.

महत्त्वाचे कायदेशीर अधिकार (CrPC अंतर्गत)

  • कलम 50: अटक केल्यावर कारण सांगणे बंधनकारक आहे.
  • कलम 41A: नोटीस दिल्यानंतर अटक न करता चौकशीसाठी बोलावता येते.
  • कलम 60A: अटक फक्त कायदेशीररीत्या आणि नियमानुसार होणे आवश्यक आहे.
  • कलम 57: 24 तासांपेक्षा जास्त पोलीस कोठडीत ठेवता येत नाही, कोर्टात हजर करणे बंधनकारक आहे.

एवढी माहिती जरी तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला कोणीही चुकीच्या पद्धतीने अडकवू शकत नाही. हा पण जर तुम्ही एखादा गुन्हा केला असेल तर, मात्र पोलीस त्यांच्या पद्धतीने कारवाई करणारच. 

Patient Rights in Hospitals – रुग्णालये रुग्णांची पिळवणूक करतायत, अन्याय सहन करू नका आत्ताच आपले हक्क जाणून घ्या; वाचा…