सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या वाई (Wai Vishesh) तालुक्यातील वयगांव या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुद्ध, स्वच्छ व थंडगार पिण्याचे पाणी मिळणार आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीचा मान ठेवत पुण्यातील दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शाळेला वॉटर प्युरिफायर देण्यात आला आहे.
पावसाळा सुरू झाला की दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची दाट शक्यता निर्माण होते. त्यामुळे एकूणच विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्यांचा गंभीर परिणाम होऊ शकतो. आरोग्यावर परिणाम झाल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम अभ्यासावर सुद्धा होऊ शकतो. या सर्व गोष्टींचा विचार करून आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे गांभिर्य लक्षात घेऊन वयगांवच्या सरपंच अश्विनी एकनाथ सुतार, उपसरपंच प्रशांत बाबुराव वाडकर आणि ग्रामसेविका श्रीदेवी नुले यांनी पुण्यातील दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टकडे मुलांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून वॉटर प्युरिफायरची मागणी केली होती. वयगांव ग्रामपंयातीने केलेल्या मागणीचा गांभिर्याने विचार करत दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शाळेला वॉटर प्युरिफायर देण्यात आला आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोमवारी (23 जून 2025) वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका आणि विद्यार्थी उपस्थित होते. या सर्व उपक्रमात ग्रामसेविका श्रीदेवी नुले यांच योगदान महत्त्वपूर्ण राहिलं आहे.